‘माळीण’ गाव सरकारच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण

प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत

मुंबई, 28 जून 2017/AV News Bureau:

सरकारने पुनर्वसन केलेल्या माळीण गावाची पहिल्याच पावसात झालेली दुर्दशा हे राज्यातील फडणवीस सरकारच्या भ्रष्ट आणि निष्काळजी कारभाराचे पारदर्शक उदाहरण आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

पुनर्वसन केलेले माळीण गाव हे राज्यातील स्मार्ट ग्राम असून पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 एप्रिल रोजी झालेल्या माळीण येथील लोकार्पण कार्यक्रमात केला होता. पण पहिल्याच पावसात माळीण गावची झालेली दुर्दशा पाहता मुख्यमंत्र्यांचा दावा किती फोल होता हे स्पष्ट झाले आहे. भयानक दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने कोट्यवधींचा खर्च करून माळीण गावाचे पुनर्वसन केले. मात्र अवघ्या दोनच महिन्यात पहिल्याच पावसात पुनर्वसीत माळीण गावची दुर्दशा झाली आहे. यामुळे माळीण गावातील लोकांना पुन्हा एकदा भितीच्या सावटाखाली जीवन जगावे लागते आहे,असे सावंत म्हणाले.

सरकारने जागेची निवड करून पुनर्वसन केलेल्या माळीण गावातील घरांच्या भिंती, पायऱ्या, ड्रेनेज पाइप्स, शाळा, मंदिर यांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते, भिंती, पायऱ्या खचल्या आहेत. रस्त्यांचे भराव वाहून गेले आहेत. त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. शाळेवर भिंत कोसळण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

सरकारने फक्त पुनर्वसनाच्या मोठ मोठ्य़ा गप्पा मारल्या. प्रत्यक्षात मात्र पुनर्वसनाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून पुनर्वसनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. लोकांच्या जीविताला असणारा धोका नव्या पुनर्वसीत गावातही कायम असल्याचे चित्र आहे, असेही सावंत म्हणाले.