राष्ट्रवादीकडून बळीराजाची सनद जाहीर

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती

मुंबई,9 जून 2017/AV News Bureau:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्या वर्धापन दिन आहे. पक्षाचा हा वर्धापदन यावर्षी संकटात सापडलेल्या बळीराजाला समर्पित करण्यात येणार आहे. तसेच या वर्षात बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष अधिक आक्रमकपणे संघर्षाची भूमिका घेणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. सरकारकडून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ‘बळीराजाची सनद’ जाहीर करण्यात आली असून ही सनद संबधित जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या माध्यमातून सरकारला दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर नवी दिल्ली येथे ‘मावळणकर’ सभागृहामध्ये पक्षाचे संस्थापक/अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर राज्यस्तरावर मुंबईतील पक्षाचे मुख्य कार्यालय असलेल्या ‘राष्ट्रवादी भवन’ येथे  व मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (क्लार्क हाऊस, नाथालाल पारेख मार्ग ) कार्यालय येथे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

या स्थापना दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यातील ५ आत्महत्याग्रस्त कुटूबांतील शालेय मुला-मुलींच्या माध्यमिक शिक्षणापर्यंतची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेतली जाणार असल्याचे तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.