9 वीच्या नापास विद्यार्थ्यांना परिक्षेची आणखी एक संधी

मुंबई, 27एप्रिल 2017/AV News Bureau:

दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पुर्नपरिक्षा घेण्याचा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने काढला आहे. या आदेशानुसार  नववीत नापास होणा-या विद्यार्थ्यांची जून २०१८ रोजी पुन्हा परिक्षा घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष वाया जाऊन शिक्षणात खंड पडू नये यासाठी राज्य सरकारने  १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुर्नपरिक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा नापास झालेल्या लाखो विद्यार्थ्यांना झाला. त्याच धर्तीवर 9 वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला. ही पुर्नपरिक्षा  संबंधित शाळांकडून घेण्यात येणार आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी अर्थात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परिक्षा घेण्याचे निर्देश शालेय विभागाने सर्व शाळांना दिले आहेत.

९ वी किंवा १० वी मध्ये गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयात विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे या विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. याविषयात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात याकरीता आणि गुणवत्ता चाचणी परिक्षेत विद्यार्थ्यांचा या विषयातील कलही लक्षात घेऊन अशा विद्यार्थ्यांसाठी खास वर्गाचे आयोजन करण्यात येऊन त्यांची पुर्नपरिक्षा घेण्यात यावी असे आदेशही सर्व शाळांना दिले आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नववीत नापास झाल्यामुळे  शिक्षणापासून दूर जाण्याच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तसेच लाखो विद्यार्थ्यांचे वाया जाणारे वर्ष रोखले जाणार असून त्यांचे  शाळा सोडण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.