कामोठे ग्रामपंचायतीचे विशेष लेखा परिक्षण करणार

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

मुंबई, 5 एप्रिल 2017/AV News Bureau:

रायगड जिल्हयातील कामोठे ग्रामपंचायतीमध्ये 2013-14 आणि 2014-15 या कालावधीत झालेल्या  गैरव्यवहाराबाबत विशेष लेखा परिक्षण करण्यात येईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

आ.प्रशांत ठाकूर, समीर कुणावार, आशिष शेलार, मनिषा चौधरी यांनी याबाबत लक्षवेधी विधानसभेत उपस्थित केली होती.

कामोठे ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराबाबत विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. या चौकशीअंतर्गत ग्रामपंचायतीच्या कामात अनियमितता झाल्याचे आढळून आले  आहे. त्यामुळे तांत्रिक आणि आर्थिक किती प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे याची अधिक माहिती घेऊन गुन्हा दाखल केल्यास दोषीला जामीन मिळणार नाही. त्यासाठी विशेष लेखा परिक्षण करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.