रस्ते कामात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई

 

नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

मुंबई,7 मार्च 2017/AV News Bureau:

शहरातील सुस्थितीत असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबतचा निर्णय घेऊन गैरव्यवहार केलेल्या संबंधित अभियंते, कंत्राटदार आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. निकषात बसत नसतानाही कामे करण्यात आली असतील तर भविष्यातही संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.

मुंबई शहरात सुस्थितीत असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्ती प्रस्तावाला महानगरपालिकेने मान्यता दिल्याबाबत ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी उत्तर देताना पाटील बोलत होते.

२०१६ पूर्वीच्या  २५० रस्त्यांच्या कामांबाबत चौकशी करण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या संबंधित कंत्राटदार, अभियंता आणि कर्मचारी यांना अटकही करण्यात आली आहे. भविष्यात निकषात न बसणा-या रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

मुंबई शहरातील रस्त्यांच्या सद्य:स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांचा पृष्ठभाग दुरवस्थेत असलेले व दोषदायित्व कालावधी / पुनर्बांधणी प्रकल्पामध्ये समाविष्ट नसलेल्या रस्त्यांची यादी संकलित करून सदर रस्त्यांच्या दुरूस्तीच्या ८२ कोटी 18 लाख रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास जानेवारी 2017 मध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी घेऊनच कार्यवाही करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.