8 मार्चला नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद

नवी मुंबई, 6 मार्च 2017 /AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 8 मार्च रोजी खारघर येथील भारती विद्यापीठाजवळील मुख्य जलवाहिनीला झालेल्या गळतीची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 या काळात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

जलवाहिनीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून  महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहील.त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.