कांदा,सोयाबीन,धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 14 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा खासकरून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या धोरणात्मक निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.
हे वाचा : गणपती उत्सवासाठी अनारक्षित विशेष गाड्यांच्या १४ अतिरिक्त सेवा
केंद्र सरकारचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरतील, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार खाद्यतेलाच्या आयातीवर आता वीस टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी खाद्यतेलच्या आयातीवर शुल्क नसल्याने आपल्या देशातील आणि राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत होता. नव्या धोरणामुळे आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारने आमच्या बळीराजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे निर्णय निश्चितपणे क्रांतीकारी ठरतील आणि त्यामुळे आमच्या कांदा,… https://t.co/zM05tIaQDO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2024
ते पुढे म्हणाले केंद्र सरकारने रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील कस्टम शुल्क 12.50% वरून 32.50% केल्याने याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
हे वाचा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती
यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारण्यात आल्याने त्याचा फटका उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. लोकसभा निवडणूकीत त्याचा अप्रत्यक्ष फटका भारतीय जनता पक्षालादेखील बसला होता. ही चूक सुधारून केंद्र सरकारने आज कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून २० टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात (एम ई पी) किंमत हे पूर्णपणे संपवली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
हे वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा चढता आलेख
बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात किंमतदेखील पूर्णपणे मागे घेण्यात आल्यामुळे बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे क्रांतिकारक निर्णय असल्याचे फडणवीस म्हणाले.
========================================================
========================================================