मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द

तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 8 जुलै 2022:

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने 8 जुलै पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणा-या पाणी पुरवठ्यातील 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

सन 2022 च्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 27 जून 2022 पासून 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱया अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत दिनांक 27 जून 2022 रोजी 1 लाख 31 हजार 770 दशलक्ष लिटर  म्हणजे 9.10 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. आज 3 लाख 75 हजार 514  दशलक्ष लिटर  म्हणजे 25.94  टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.

तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप