पाणी गुणवत्ताबाधीत गावांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविणार

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, ९ जुलै २०१९ :

राज्यातील पाणी गुणवत्ता बाधीत गावे/वाड्यात शासनामार्फत ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा (आरओ) कार्यान्वित करण्यात आली आहे. उन्हाळ्यात या पाणी शुद्धीकरण यंत्रणेतून ग्रामस्थांना थंड पाणीपुरवठा करण्यासाठी वॉटर चिलर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

पाणी गुणवत्ता बाधीत गावांमध्ये डीएफयू, आरओ, यूव्ही, यूएफ व वॉटर चिलर बसविणे बाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी लोणीकर बोलत होते.

निती आयोगामार्फत राज्यातील फ्लोराईड बाधीत 122 गावे/वाड्या पाणी शुद्धीकरण यंत्रणा (डीएफयू) कार्यान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलस्वराज्य टप्पा-2 अंतर्गत राज्यातील क्षारबाधीत 111 गावे/वाड्यात पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यातील फ्लोराईड बाधीत 100 गावे/वाड्यात हात पंपावर आधारित पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या कामाची निविदा तयार करुन मंजुरीसाठी सादर केली आहे. चंद्रपूर व जालना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येणाऱ्या पाणी शुद्धीकरण यंत्रणेत सुमारे 300 वॉटर चिलर बसविण्याबाबतची निविदा 9 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचेही  लोणीकर यांनी सांगितले.

===============================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा