नव्या चेहऱ्यांना विधानसभेला संधी देऊ: काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • छत्रपती संभाजी नगर, 12 ऑगस्ट 2024

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, त्यामागे जनतेची भक्कम साथ आहे. २०१९ ला राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता पण २०२४ मध्ये १४ खासदार झाले. लोकसभेला विजय मिळाला तशीच कामगिरी विधानसभेलाही करायची आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तयाराची आढावा बैठक व मराठवाड्यातील खासदार यांचा सत्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला, त्यावेळी चेन्नीथला बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख, खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे अध्यक्ष आमिर शेख, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, छत्रपती संभाजी नगर काँग्रेसचे अध्यक्ष युसुफ शेख, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी २००० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली ती केवळ निवडणुका डोळ्यासमोर केली आहे.  २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी धनगर, मराठा, आदिवासी समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले पण १० वर्ष सत्ता असतानाही आरक्षण मात्र दिले नाही. भाजपा व फडणवीस यांनी जाती जातीमध्ये भांडणे लावली आहेत, त्यात जनतेने पडू नये मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी तुम्हाला न्याय देतील. गोरगरिबांच्या तोंडाचा घास हिसकावणारे निर्ढावलेले महायुती सरकार जाऊन महाराष्ट्रात काँग्रेस मविआचे सरकार येणार हे काळ्या दगडावरी पांढरी रेष आहे, असे नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाही व राज्यघटनेवर आघात होत असताना देशातील सर्वसामान्य माणूस काँग्रेस इंडिया आघाडीच्या पाठीशी उभा राहिला याची इतिहासात नोंद होईल. भारतीय जनता पक्षाला अहंकार झाला होता तो अहंकार जनतेने भेदून टाकला आहे . आता विधानसभा निवडणुकीलाही इतिहास घडवायचा आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महायुती सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, भाजपाने लोकसभेला रामाच्या नावाने मते मागतिली पण जेथे जेथे प्रभूरामाचा पावन स्पर्श झाला त्या त्या जागी भाजपाचा पराभव झाला. महायुती सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे, ५ लाख कोटी रुपायांची टेंडर मंजूर करून त्यातून लुट केली आहे. एक एक उद्योग गुजरातला पळवून नेले, महिंद्राचा २५ हजार कोटी रुपयांचा उद्योग येणार होता तोही गुजरातला घेऊन गेले. महायुती सरकारने महाराष्ट्राच्या खूर्चीवर बसून राज्य गुजरातला गहाण टाकले आहे .

यावेळी बोलताना विधानपरिषदेतील गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाने यशाचा पाया घातला आहे विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळवून त्यावर कळस चढवायचा आहे आणि मविआचे सरकार आणायचे आहे.

प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यावेळी म्हणाले की, अल्पसंख्यांक विभाग मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाच्या पाठाशी उभा राहिला आहे काँग्रेस पक्षाने सुद्धा अल्पसंख्यांक समुदायाला योग्य प्रतिनिधित्व दिले पाहिजे.

यावेळी बोलताना माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले की, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख साहेब आमचे नेते आहेत, काही नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांना पक्षाने काही कमी दिलं नव्हतं, लोकांना हे आवडलं नाही म्हणून लोकांनी दाखवून दिलं की “कल जो रंग थे आज वो दाग हो गये”. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो .

=======================================================


====================================================