केंद्र आणि राज्यातील सरकार बंडलबाज

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

यवतमाळ, 16 ऑक्टोबर 2017:

केंद्र आणि राज्यातल्या सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून  सर्वच घटकांची फसवणूक करणारे भाजपचे सरकार बंडलबाज आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारताना झालेल्या विषबाधेमुळे 22 शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. 750 शेतक-यांना विषबाधा झाली आहे. राज्यात रोज शेतकरी मरतायेत पण सरकार मात्र निष्क्रिय आहेत. सरकारच्या या निष्क्रियते विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

भाजप सरकारने दिलेले एकही आश्वासन तीन वर्षात पूर्ण केले नाही. या सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले, अन्नधान्याच्या किमती वाढवल्या, महागाई वाढवली, जातीय तणाव वाढवला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी समाजवरील अत्याचारात वाढ झाली. मराठा, मुस्लीम, धनगर समाजाची आरक्षणाचे गाजर दाखवून सरकारने फसवणूक केली आहे. काल परवा झालेल्या अतिवृष्टीत गाजराचे पीक वाहून गेले आहे.  त्यामुळे या सरकारची गाजराची पुंगी वाजणार नाही असा टोला चव्हाण यांनी लगावला.   शेतकरी, व्यापारी, महिला, विद्यार्थी ,तरूण कोणीही या सरकारच्या कमाकाजावर समाधानी नाही. या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. अद्याप एकाही शेतक-याला कर्जमाफीचा एक रूपयाही मिळाला नाही. जीएसटीमुळे व्यापार ठप्प झाला आहे. बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना रोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे परिवर्तनाची गरज आहे. काँग्रेस पक्ष परिवर्तनासाठी रस्त्यावरून संघर्ष करायला तयार आहे, तुम्ही साथ द्या परिवर्तन घडवू असे आवाहन  चव्हाण यांनी केले.