पनवेल-सावंतवाडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सव काळात 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान असणार बंदी

मुंबई, 3 ऑगस्ट 2017/AV News Bureau :

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर  म्हणजे पनवेल ते सावंतवाडी दरम्यान २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांना  बंदी करण्यात आली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बध लागू नसतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान सभेत दिली.

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्यादा बसेस सोडण्यात येतात. मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. गणेशोत्सवाच्या काळात ही वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी १६ टनापेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना या महामार्गावर पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) दरम्यान २३ ऑगस्टपासून मर्यादित कालावधीसाठी बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल ते सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमरेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी असेल.

खालील दिवसांत अवजड वाहनांवर  बंदी

  • 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून 25 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेपर्यंत.
  • 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 1 सप्टेंबर रोजी 8 वाजेपर्यंत,
  • 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 6 सप्टेंबर रोजी 8 वाजेपर्यंत
  • 26 ते 30 ऑगस्ट व 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत .
  • 26 ते 30 ऑगस्ट व 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत नमूद वाहनांना रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी राहील.
  • 23 ऑगस्ट रोजी 1 वाजेपासून 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 या कालावधीत या महामार्गावर वाळू, रेती व तत्सम गौणखनीजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहील.