शेतक-यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण

मुंबई 1 जून 2017/AV News Bureau:

केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसलेल्या लोकांना शेती आणि शेतक-यांच्या प्रश्नांबाबत काहीच कळत नसल्याने शेतक-यांवर संप करण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पक्षाचा शेतक-यांच्या संपाला पाठिंबा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

 भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात साडे नऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. चुकीची धोरणे राबवून सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. यावर्षी सरकारच्या आवाहनामुळे शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीचे पीक घेतले. मात्र सरकार शेतक-यांची तूर खरेदी करायलाही टाळटाळ करत आहे. सोयाबीन, तूर, कांदा, फळे, दूध अशा शेतक-यांच्या कुठल्याही मालाला भाव नाही. शेतक-यांनी आणि विरोधी पक्षांनी याबाबत वारंवार सरकारकडे मागण्या केल्या काँग्रेस पक्षाने विधीमंळात तसेच रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी केली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतक-याला संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हाच तातडीचा उपाय आहे. पण आज सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी शेती आणि शेतक-यांचे प्रश्नच कळत नाहीत त्यामुळे भारताच्या इतिहासात कधी नव्हे ते संप करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे असे चव्हाण म्हणाले.

शेतकरी संपावर जाणे भूषणावह नाही

शेतक-यांनी संपावर जाणे कुठल्याही राज्यासाठी भूषणावह नाही. शेतक-यांनी मुंबई पुणे यासारख्या शहरात जाणारे दूध भाजीपाला फळे यांचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे शहरातील लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे सरकार शेतक-यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील आहे हे स्पष्ट आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.