डिसेंबर २०१८ अखेर सर्व शाळा होणार डिजिटल

आतापर्यंत ग्रामीण भागातील ४४ हजार शाळा डिजिटल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, 21 मे 2017/ AV News Bureau:

शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानामुळे राज्यातील शाळा डिजिटल करण्यात येत असून डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील सर्व शाळा डिजिटल होतील आणि त्यातून विद्यार्थ्यांना या अभियानांतर्गत आनंददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवा पिढीशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या प्रसारित झालेल्या पहिल्या भागात मुख्यमंत्री बोलत होते.

गेल्या २ वर्षातील शैक्षणिक प्रगती पाहता महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात १८ व्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आज खाजगी शाळांमधून जवळपास १५ हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकत आहेत, याचा अर्थ या शाळांमधील शिक्षण आणि प्रयोगशील शिक्षकांचे हे यश आहे. विशेष म्हणजे शहरांपेक्षा ग्रामीण भागात शाळा डिजिटल होत असून आतापर्यंत ग्रामीण भागातील ४४ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत.

वेगवेगळ्या खाजगी शाळांमध्ये भरमसाठ शैक्षणिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत, या तक्रारी दूर करण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरण काम करीत असून त्यासाठी नव्याने डॉ. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

टेकसॅव्ही’ शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांनी केले  कौतूक

विद्यार्थ्यांना घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ५० हजार शिक्षकांनी स्वतःला ‘टेकसॅव्ही’ घोषित केले आहे. या शिक्षकांनी वेगवेगळे ॲप्स तयार करुन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचन-लेखनही महत्त्वाचे

आज डिजिटायझेशन, हायस्पीड टेक्नॉलॉजी याचा शिक्षणात वापर करीत असलो तरी शिक्षणात लेखन-वाचन देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे. आज काहीही संशोधन करायचे असले तरी गुगलचा वापर करण्यापेक्षा वाचन वाढवून स्वतःच्या नोटस काढण्याचा सल्ला देतानाच पारंपरिक ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.