अर्थसंकल्प नाही तर ‘अनर्थ’संकल्प

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

मुंबई, 18 मार्च 2017/AV News Bureau :

अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने दुष्काळानं पिडीत लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. घोषणांचा सुकाळ व स्वप्नांचे इमले असलेल्या या अर्थसंकल्पाने राज्याला आर्थिक संकटात, अराजकतेच्या खाईत लोटलं आहे. हा अर्थसंकल्प नाही तर ‘अनर्थ’संकल्प आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.

राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची आशा होती, ती आशा फोल ठरली आहे. राज्याचा विकासदर वाढत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे, परंतु विकासदर निश्चितीचे निकष बदलून सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. राज्यातील पिकांची हेक्टरी उत्पादकता घटत असताना सरकार उत्पादनवाढीचा करत असलेला दावा फोल आहे. गेल्यावर्षी शेतीकेंद्रीत अर्थसंकल्प सादर झाला व राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या, हे सरकारच्या अर्थसंकल्पाचे फलित आहे, असे मुंडे म्हणाले.

नोटाबंदीनंतर ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, मध्यमवर्गीय माणूस सरकारकडे आशेने पाहत होता, परंतु सरकारने या सगळ्यांची निराशा केली आहे. सिंचनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही, सिंचनक्षेत्र वाढवण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्यपाल महोदयांनी सरकारवर टीका केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मेट्रो, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी व इतर नागरी प्रकल्पांवर मोठा खर्च दाखवला आहे, परंतु तिथेही विकासाची गती धीमी आहे, असे मुंडे यांनी सांगितले.